चंद्रपूर – चंद्रपूरच्या नागपूर रोडवर पडोली चौकाजवळ पुन्हा एकदा प्रशासनाच्या बेजबाबदार कारभाराने बळी घेतला. चंढ्ढा कंपनीच्या अनधिकृत वळण घेतलेल्या बलगर टँकरची पलटी होऊन रस्त्यावर मोठ्या प्रमाणात राख पडली. नागरिकांनी वेळेत तक्रारी करूनही प्रशासन गप्पच राहिलं. कोण बघतंय त्यांच्या तक्रारी! या ट्रान्सपोर्ट कंपन्यांकडून हप्ते उचलणाऱ्या आरटीओ अधिकाऱ्यांना जनतेच्या जीवाची काय किंमत?
तीन-चार हजारांचे खिसे गरम करून चंद्रपूर आरटीओ डोळेझाक करतंय. नागपूर रोडच्या दोन्ही बाजूंना चंढ्ढा ट्रान्सपोर्ट आणि डीएनआरचे ट्रक बेकायदेशीरपणे उभे केले जातायत. त्यामुळे अपघात होतायेत, लोक मरतायेत. पण जबाबदार कोणी? स्थानिक जागरूक नागरिकांनी यावर आवाज उठवला, प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांना निवेदन दिलं, पण कारवाई काहीच नाही. पैसे खाल्लेल्या अधिकाऱ्यांना सामान्य जनतेच्या जिवावर काय फरक पडतो?
ही बेजबाबदारपणाची किंमत चंद्रपूरवरून नागपूरला जाणाऱ्या एसटी प्रवाशांना चुकवावी लागली. 14 मार्चच्या सायंकाळी, पडोली चौकात उभ्या असलेल्या अनधिकृत ट्रकवर एसटी बस आदळली. ड्रायव्हरच्या म्हणण्यानुसार, हवेत पसरलेल्या राखेमुळे पुढे काहीही दिसेनासं झालं, आणि थेट ट्रकवर धडक बसली. कंडक्टर जागेवरच ठार झाला, तर अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले. आता तरी प्रशासन जागं होईल का?
कोणाच्या आशेवर बसायचं? मृत्यूनं घेरलंय रस्ते, पण बड्या बड्यांचे हितसंबंध असल्यामुळे कुणी आवाज उठवत नाही. नागपूर रोडवर रोज मोठमोठे ट्रक उभे असतात. ह्या ट्रान्सपोर्टवाल्यांना आरटीओनं परवानगी दिली का? कि पैशाच्या जोरावर डोळेझाक केली जाते? जनता मेली तरी चालेल, पण मलींदा मात्र हवाच!
हा अपघात होता की हत्याकांड? सरकारी अनास्थेमुळे मृत्यूचं ठिकाण झालेल्या रस्त्यांचा जबाबदार कोण? चंढ्ढा ट्रान्सपोर्ट, आरटीओ, पोलिस, महामंडळ, कोण पकडणार जबाबदारी? आताही कारवाई झाली नाही तर येणाऱ्या काळात आणखी किती निष्पाप लोकांचा बळी घेणार ?
ही हत्या आहे, अपघात नाही!
टँकर उलटून रस्त्यावर राख पडली. नागरिकांनी तक्रार केली. पण प्रशासनाला फरक पडत नाही. 14 मार्चला जेव्हा ही बस ट्रकवर धडकली, त्यावेळी ड्रायव्हरला समोरचं काही दिसलंच नाही. रस्त्यावर पडलेल्या राखेमुळे समोर अंधार झाला आणि एका क्षणात अपघात झाला. ही नैसर्गिक आपत्ती नाही, ही सरकारी उदासीनतेमुळे झालेली हत्या आहे!
ह्या ट्रान्सपोर्ट कंपन्यांनी सरकारी रस्त्यांवर कब्जा केला आहे. सामान्य गाड्यांना रस्ता नाही, पण हे ट्रक भर रस्त्यावर उभे राहतात. आरटीओ यांच्या सेटिंगमध्ये हे सगळं चालतं. कारण महिन्याच्या महिन्याला या ट्रकवाल्यांकडून पैसे घेतले जातात. हा अपघात नाही, तर भ्रष्टाचाराने झालेली जीवघेणी दुर्घटना आहे.
आरटीओ, चंढ्ढा आणि DNR यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा!
हा अपघात नाही, तर व्यवस्थेने केलेला खून आहे. सरकारने यामध्ये तातडीने लक्ष घालायला पाहिजे. आरटीओ अधिकाऱ्यांना जबाबदार धरलं पाहिजे. चंढ्ढा ट्रान्सपोर्ट आणि DNR यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. एखादा सामान्य नागरिक चुकीने गाडी चुकीच्या ठिकाणी उभी केली, तर लगेच दंड ठोठावला जातो. मग ह्या ट्रान्सपोर्टवाल्यांना का सोडले जाते?
हे ट्रक हटवले नाहीत, या कंपन्यांवर कठोर कारवाई केली नाही, तर उद्या आणखी कित्येक निष्पापांचा जीव जाणार आहे. आज कंडक्टर गेला, उद्या कोण असेल? याच चौकात पुढील वेळी एखाद्या शाळेची बस आदळली तर? हे प्रशासन इतकं मुर्दाड झालंय की त्यांना या प्रश्नांची भीतीच वाटत नाही.
सरकार जागं होईल का? की पैशांसमोर पुन्हा गुडघे टेकणार?
हे सरकार खरोखर लोकांचं आहे का ह्या हप्तेखोर अधिकाऱ्यांचं? जेव्हा मोठा नेता किंवा मंत्री येतो, तेव्हा सगळी यंत्रणा तातडीनं रस्ते स्वच्छ करते, वाहतूक सुरळीत करते. पण सामान्य जनतेच्या जीवावर ह्या अधिकाऱ्यांना काहीही फरक पडत नाही.
चंद्रपूरचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांना विचारायचं आहे— किती लोकांचे मृतदेह दिसले की तुम्ही जागे होणार? आरटीओचं उघडपणे भ्रष्टाचार सुरू आहे, ट्रान्सपोर्टवाल्यांना नियम कायद्याची भीती राहिलेली नाही. मग सरकार तरी काय करतंय?
बघायचं आता—सत्ताधारी जागे होतात की अजून किती लोकांना मारल्यानंतर त्यांना शुद्ध येते!